Thursday, 20 May 2021

विकत घेताना (भाग-२).... (देशी)

 विकत घेताना (भाग २)…. (देशी)

वैविध्यतेने नटलेल्या आणि परंपरांचे पाईक असलेल्या आपल्या भारत देशात विक्रेत्यांचेही निरनिराळे प्रकार आहेत.

मला तर असं वाटतं की नेहरूंच्या काळात जशी भाषावार प्रांतरचना झाली तशीच विक्रेते-वार प्रांत रचना विसाव्या शतकाच्या शेवटी झाली असती. फक्त त्यासाठी भारतात उदारीकरण करणारे नरसिंह राव अजून एक टर्म पंतप्रधान असायला हवे होते!

काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि मुंबई पासून कोलकत्यापर्यंत प्रत्येक विक्रेत्याचं एक स्वतंत्र ”शास्त्र असतं”. ते एकदा समजलं की व्यवहारात खूप मजा येते.

सहलीला गेलेले कुटुंब-कबिले दिल्लीच्या विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशनवर  ‘एक पे चार फ्री’ वाल्या गालिच्यांच्या वळकटीसकट पाहिले की ही मंडळी ‘काश्मिर-रिटर्न” आहेत हे लगेच लक्षात येते.

काश्मिरपासून झंझावाती सुरू झालेली ही ‘विक्रेता-गिरी’ जसजसे आपण खाली जाऊ तसतशी कमी होत जाते. केरळ/तामिळनाडूचा विक्रेता आपलेच सामान विकायला हात आखडता घेतो किंवा फक्त आपल्याला हव्या असलेल्या (selective) खरेदीदारालाच विकतो. तर अरबी समुद्राच्या काठी मुंबईतला/गुजराती विक्रेता हा आपला माल उजवायला अत्यंत ‘उजवा’ असतो. पण आपण जसजसे उजवीकडे सरकत राहू तसा हा ‘उजवेपणा’ कमी होतो आणि बंगालच्या उपसागराच्या जवळ तर अगदी ‘डावा’ होऊन जातो!!

काश्मिरी माणूस हा भारतातील सर्वोत्तम विक्रेता आहे यात अजिबात शंका नाही. काश्मिरी विक्रेता हा विकत घेणार्यांचा आधी ‘अभ्यास’ करतो. त्यांची मर्मस्थाने जाणून घेतो आणि मग विकायला येतो. अगदी साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास दल-लेकच्या किनारी बरेच होडीवाले आपल्याशी व्यवस्थित मराठी बोलतात.

तर ‘पहाडी’ विक्रेता हा विकायच्या बाबतीत तितकाच काटक असतो. तो कमी गोड बोलेल पण कस्टमरला चिकटून राहतो. सोडत नाही. वैष्णव देवीच्या मंदिरात जाताना तुम्ही नाकारललेले सगळे ‘पिठ्ठू’ तुमच्या बरोबर बराच काळ चालत रहातात. हा त्यांचा चिवटपणा!!

माझ्या मते 'सरदारजी' हा भारतातला सर्वात हुशार विक्रेता आहे. त्यांच्या नैसर्गिक आक्रमक स्वभावामुळे सुरुवातीलाच खरेदी करणारा ‘बॅकफूटवर’ जातो. त्यांची धंद्याची गणितं एकदम पक्की असतात. विनवण्या करून आपला माल खपवणारा सरदारजी विक्रेता कुठेही आढळणार नाही.

राजस्थानी विक्रेता हा नेहमी ‘हल्दी घाटी’ तून आल्यासारखा व्यवहार करताना आढळतो. काहीही झाले तरी तो आपले मैदान सोडत नाही. (कार्पोरेट भाषेत यालाच : the battle is not over yet as I have not won still  असे म्हणतात). डील संपल्यानंतरही ‘हमारा कोटेशन एक बार देखो, सर’ म्हणणारा विक्रेता बहुतेक वेळा ‘राजस्थानी’ निघतो. कदाचित त्यामुळेच आपल्या अवतीभवती असणारी किराणा मालाची दुकाने पहा..कधीही बंद झालेली किंवा डबघाईस आलेली आढळत नाहीत.

गुजराती पण असाच, फक्त तो खूप गोड असतो -अति गोड!! “मिठास वाणी आणि धंदा-पाणी” याचे गणित मनात पक्के असते त्याच्या!

दक्षिणेकडील मंडळी बोलतानाच दचकतात.. कदाचित माझ्याशी हिन्दी बोलावं लागेल किंवा माझं इंग्रजी ऐकायला लागेल - अशी दुहेरी भीती त्यांचा चेहरा स्पष्टपणे दाखवते! माझ्या दिल्लीच्या वास्तव्यात तेव्हा पांढरी शुभ्र लुंगी, पांढरा शर्ट, पांढरी चप्पल, कपाळावर पांढरा टिळा लावलेली आणि पाचही बोटात अंगठ्या, हातात ब्रेसलेट, गळ्यात चमकणारी चेन घातलेली मंडळी आम्हाला भेटायला येत असत. येताना भारत सरकारच्या लेटरहेडवर शिफारस पत्र आणत. आणि आम्हाला प्रेमळ धमकावत… 

“साssर, we are from Minister’s constituency and want to work with your good company in Chennai.” 

मग आम्ही त्यांना आमच्या चेन्नईच्या टीमकडे पाठवायचे आणि त्या टीमने आमच्याकडे असा खो-खो काही काळ चालत राही.

कलकत्त्याच्या विक्रेत्यांशी बोलताना काहीही झाले तरी मिटींग एका दमात संपवावी!! मध्ये ब्रेक घेण्याची चूक करू नये. नाहीतर डाव‌ हल्लाच म्हणून समजा!! तो कलकत्तावासी मधल्या ब्रेकमध्ये निकोटीन भरुन येतो आणि नंतर (माझ्यासारख्याला) त्या मिटींग रुममध्ये बसणे अवघड होते!! (‘मास्कचा वापर' आणि ‘दो गज दूरी' या संकल्पनेनंतर ऑफीसात बसून निगोसिएशन्स केलेले नाहीत! कदाचित वेगळा अनुभव येऊ शकेल)

हैद्राबादी विक्रेता कधीही आपल्या प्रॉडक्ट ची किंमत हलवत नाही. त्यामुळे त्यांच्याशी ‘negotiation’ कठीण असते.

आपले पुणेरी विक्रेते धमाल असतात. त्यांना प्रॉडक्टचे टेक्निकल ज्ञान अफाट असते. प्रत्येक गोष्टीचा कीस काढण्याची मध्यमवर्गीय सवय negotiations मध्ये डोकावणार याची खात्री असते!! व्यवसायासाठी पुण्याहून मुंबईला प्रवास करणारे पुणेकर विक्रेते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मुंबईत मिटींग संपली नाही आणि पुण्यात परतायला उशीर होणार हे जाणवले की सैरभैर झालेच म्हणून समजा!!

काहीही असले तरी ही सगळी मंडळी शेवटी मुंबई आणि दिल्ली इथे येऊन मिसळतात कार्पोरेट विक्रेत्यांची मुंबई आणि दिल्ली ही दोन महत्त्वाची तिर्थक्षेत्रं आहेत. आणि त्या दोन्ही क्षेत्रांच्या विकण्याच्या पद्धतीत ‘वारकरी’ आणि ‘सोवळे-करी’ इतका फरक आहे!

सकाळी सात बावन्नची लोकल पकडून ऑफिसला येणारा मुंबईकर विक्रेता हा सरळमार्गी असतो. उत्पादन, त्याची किंमत, त्याचे स्पेसिफिकेशन्स वगैरे गोष्टींबद्दल त्याला पूर्ण माहिती असते. बाकीच्या इतर गोष्टींची त्याला फिकीर नसते. त्याची मिटींग ही ठरलेल्या वेळेनुसार संपते. आणि त्याला ऑर्डर मिळो अथवा न मिळो तो संध्याकाळी सहा सत्तावीस ची लोकल पकडून घरी जातो. याउलट दिल्लीकर आरामात दुपारी येतात. कितीही वेळ वाट बघत रिसेप्शनमध्ये बसू शकतात. प्रत्यक्ष मिटींगमध्ये काही प्रश्न विचारले तर ‘हमारे एक्स्पर्ट को कल भेज देता हुं, आप पुंछ लो जो चाहिए वो’ असं उत्तर देतात. 

या प्रकाराला माझ्या दिल्लीच्या सुरूवातीच्या कार्यकाळात मी इतका वैतागलो होतो की शेवटी बॉसकडे तक्रार केली तेंव्हा तो म्हणाला, ‘धीरे धीरे आदत हो जाएगी. पेशन्स रखो’!!

मला भेटायला येणारा जवळजवळ प्रत्येक विक्रेता ‘आप पहिली बार दिल्ली आए हो? कुतूबमिनार देखा? इंडिया गेट घुमने चलते है….’ वगैरे वगैरे. फाफटपसारा बोलत वेळ घालवायचा.  याउलट मुंबईतल्या विक्रेत्याला तुम्ही ‘गेटवे ऑफ इंडिया' किंवा ‘म्हातारीचा बूट’ बघितला आहे की नाही यात काडीचाही रस नसतो. 

मुंबईकर फोन करेल. आपले प्रॉडक्ट थोडक्यात सांगेल. मिटींगची वेळ घेईल आणि त्यावेळेत येऊन आपल्याकडची सगळी माहिती देऊन‌ चर्चा करेल आणि ऑर्डर घेऊन अथवा न‌ घेता धन्यवाद देऊन निरोप घेईल.

दिल्लीकर फोन करेल. “साब, आज क्या प्लॅन है? बहुत दिन हो गये आपके साथ चाय पीके?? कब बुलाओगे?? (यात ‘चाय’ हे मला रूचणारे आणि पचणारे पेय आहे. बाकीच्यांना आपल्या आवडीनुसार वाचण्याची मुभा आहे!!).

माझा एक मुंबईचा विक्रेता मित्र माझ्याच काळात गुरगावला नोकरीसाठी आला होता. काही दिवसांनी कुटूंबासह आम्ही घरी भेटलो. ‘तू मुझे सुना, मै तुझे सुनाऊ’ शैलीतील त्या गप्पांमध्ये त्याने सांगितलेला किस्सा अफलातून होता. तो म्हणे, “मी कंपन्यांमध्ये फोन करतो, तर दरवेळी पर्चेसचे साहेब मिटींगमध्ये असतात. जर भेट झाली तर प्रॉडक्ट, स्पेसिफिकेशन्स मध्ये त्यांना अजिबात रस नसतो. त्यामुळे दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ मिटींग होत नाही. सेल तर दूरच पण विकत घेण्याची संधी (opportunity) पण दिसत नाही. दुसर्या बाजूने बॉस ढकलतो ‘जा, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बैस. कस्टमर सोबत जेवण कर. त्याला गुंतवून ठेव. रिलेशनशिप बनाओ'. आता जर कस्टमरला माझ्या प्रॉडक्ट मध्येच रस नसेल तर मी चहा पिऊन काय फायदा?” 

पण एव्हाना मी रूळलो होतो त्यामुळे मी त्याला हा “सांस्कृतिक” फरक समजावून सांगितला. तो त्याला पटला आणि नंतर तोही मग कधी-कधी मला फोन करून ‘चाय पीनी है’ म्हणायला लागला!!

खरंतर, विक्रेत्यांचा मूळ स्वभाव आणि त्यांच्या कंपनीचा स्वभाव यांच्या मिश्रणातून एक रसायन जन्माला येते. ते कितीही वेगवेगळं असलं तरी ‘डील जिंकणं’ हाच प्रत्येकाचा मोक्ष असतो. भले प्रत्येकाचा मार्ग वेगळा असेल कदाचित!!

माझ्यासारख्या नेमस्ताला हे सगळे विक्रेते जवळून अनुभवता आले. विकण्याच्या पद्धतींशिवाय प्रत्येकाची सांस्कृतिक, सामाजिक जडणघडण, त्यांच्या प्रदेशातील उद्योग, कुटुंब व्यवस्था, खान-पानाच्या सवयी हे सगळे समजून घेता आले. माझ्या मैत्रीच्या भौगोलिक कक्षा रुंदावल्या. त्यांच्यासोबत ‘बिहू”, उगादी, बैसाखी आदि साजरे करता आले. ही मंडळी सुद्धा गणेशोत्सवाचा भाग झाली.

त्यातूनच मला विविधतेने नटलेल्या भारताचे दर्शन झाले आणि पर्चेस सारख्या thankless profession चा आजपर्यंत भरपूर आनंद लुटता आला.


*****



 


 


No comments:

Post a Comment