Friday, 8 February 2019

नावात काय आहे??

खरंतर, “नावात काय आहे?” – असे म्हणणार्या माणसालाही एक नाव होतेच की! पण विषय तो नाही. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या भारत देशात असंख्य पंथाची आणि प्रातांची एक “नाव-संस्कृती” आहे. बहुतांश माणसांना स्वतःचे नाव ठरवण्याचा आधिकार नसतो. जन्म देणारे जे ठरवतील ते नाव – ही आपली ढोबळ परंपरा.. तरीही या नाव ठेवण्याची (धारण करण्याची) एक विशिष्ठ पद्धत आहे. त्यात बर्यापैकी सुसूत्रता आहे. आई-वडील किंवा इतर संबंधीत नातेवाईक, आप्तांच्या मानसिकतेतून पुढील पीढीची नावे ठरतात. साधारणपणे घरच्या मोठ्या मुलाचे नाव आद्य-देवतेचे असावे या विचारातून ‘गणपती, गजानन, भालचंद्र’ वगैरे पासून सुरू असलेला प्रवास मग पुढे ‘ओंकार, विघ्नेश, शार्दूल’ असा सुरू रहात आजकाल ‘इभान, स्वोजस, परिन’ पर्यंत पोचलाय. पण शक्यतो ‘लंबोदर, एकदंत’ अशा नावाची माणसं समाजात फार कमी आढळतात किंबहुना नसतातच.

पण काही नावं लक्षवेधी असतात. सर्वसाधारणपणे आपल्या पाल्याचे नाव ‘वेगळे’ असावे यातून मग पुढे गमती-जमती होतंच असतात. काहीवेळा अशी नावे त्या नावाच्या ऐतिहासिक, पारंपारिक संदर्भाना छेद देतात आणि मग आपण असे नाव असलेली ती व्यक्ती आणि त्याचा पुरातन संदर्भ यांच्या गोंधळात हरवून जातो.

माझ्या लहानपणी माझ्या वडिलांच्या एका मित्राने माझा असाच गोंधळ केला होता. हा मोठा अवलिया माणूस. पांढरे सोगा सोडलेले धोतर, ‘पान-तंबाखू खाणारा’ अशी ‘ठिबक-सिंचीत’ ओळख दाखवणारा पांढरा सदरा,  डोक्यावरची तिरकी टोपी, कपाळावर सकाळी बस्तीत जाऊन आल्याचा पुरावा देणारा गंधाचा लहानसा टीळा, पिळदार मिशा आणि पायातले भरपूर तेल प्यालेले कोल्हापूरी पायताण कर्-कर् वाजवत ‘नमस्कार ओ भाऊसाहेब’ अशी कानडी हेल असलेली सलामी देत स्वारी घरी यायची. विधात्याने जन्माला येतानाच एक डोळा कमी दिला असल्याने दुसर्या डोळ्याने संपूर्ण जग पहाण्यासाठी मान अशंतः वाकडी करायची सवय असावी. या माणसाचे नाव होते – “दुर्योधन”. गावात सगळेजण त्यांना दुर्योधन सावकार म्हणत. पीढीजात सावकारी असावी. “कारखान्यावर आलो हुतो, उस घातलाय यंदा, हिकडं. रत्नाप्पाआण्णा भेटले, आता जाताजाता तुमास्नी भेटून गावाकडं परत जायचं....” अशी सुरूवात करत वडिलांसोबत गावाकडच्या गप्पांची मैफिल रंगायची. या माणसाची पान खाण्याची पण एक विशिष्ठ पद्धत होती. आधी बटव्यातून दोन पानं काढायची, ती धोतराला पुसायची. मग त्याची देठं खुडायची आणि चुना लावून ती पानं तशीच तोंडात टाकायची.  मग चवीपूरता काथ नखाने खूडून तोंडात टाकायचा. आणि मग आडकित्याने सुपारी कुरतडत – गप्पांचा अड्डा मांडत – सुपारीचे बारीक तुकडे चघळायला तोंडात टाकायचे. “दोन एकर उस लावलोय यंदा. मळीत थोडं टामॅटो आणि मिरच्या लावलोय” किंवा “रत्नाप्पा आण्णाच्या कारखान्यातली पहिली उचल मिळायला अजून महिना लागंल त्याच्याआधी सा.रे. पाटील देईल बगा”. अश्या संवादातून मनात तयार झालेला ‘दुर्योधन’ पुढे हस्तिनापूरात पांडवांशी कट-कारस्थान करेल किंवा द्रौपदीचे वस्त्रहरण करेल हे त्यावेळी बाल-मनाला पटतच नसे. त्यातूनच दुर्योधन ‘स्वार्थी’ असेल पण ‘दुष्ट’ नसावा असे माझे मत झाले होते.

माझे आजोळ हे दत्तगुरूंचे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र. या दोन-अडीचशे उंबर्याच्या गावात बहुसंख्य कुटूंब ही या मंदिरात पुजा करणारे – पुजारी. त्यामुळे घरोघरी मुलांमध्ये “दत्तात्रेय, दिगंबर, श्रीपाद किंवा अनुसया” सापडणारच. मग या सगळ्या नावातून आपल्याला हवा आहे तो ‘दत्ता’ कसा शोधायचा? या प्रश्नाचा निकाल फार सुटसुटीतपणे या गावाने सोडवला होता. ज्याची मान थोडी जास्त उंच तो ‘दत्ता जिराफ’! कुणाला चिरमुर्याचे भडंग जास्त आवडते तो “दत्ता-भडंग”. सहा मुलींच्या पाठीवर झाला म्हणून कुणी ‘दिगू-सात”!! वगैरे, वगैरे. इथे ही नाव-संस्कृती इतकी खोलवर रूजली आहे की, बस स्टँड बर उतरल्यावर जर कुणाला सांगितले की, मला मोदक पुजारींच्या घरी जायचे आहे, तर कुणीही बरोब्बर घर दाखवतो. पुढच्या पिढीतील एखाद्याला त्याच्याविषयी विचारले तर तो, “मी दिगू सातचा मुलगा/नातू” असं सांगायला आजिबात संकोचत नाही.

असे बाळकडू मिळाले तर पुढे शाळा-कॉलेजात अस्मादिकांच्या कल्पकतेला उधाण आले नाही तरच नवल!!
पण खरी गम्मत आली ती जेंव्हा मोठ्या शहरात आणि मल्टिनॅशनल कंपनीत काम करताना. भारतातल्या निरनिराळ्या भागातून आलेली ही मंडळी आपल्या वेगवेगळ्या नावांसोबत तिथल्या “नाव ठेवण्याच्या” वेगवेगळ्या पद्धती घेऊन येतात. त्यातून काही भन्नाट प्रसंग घडतात.
आमच्या ऑफिसात एक गोरखपूर-नेपाळ सीमेलगतच्या उत्तर प्रदेशातला एक इंजिनियर नवीनच आला होता. त्याचे नाव पशुपतिसिंग. हा हरहुन्नरी माणूस लवकरच सगळ्या नव्या  वातावरणात रूळला. पण आठवडाभरात माझ्या लक्षात आले की याच्या नावाचे लघू-रूप प्रचलित झाले आहे.  सर्वजण त्याला “पशू” म्हणून हाक मारत असत. मी एक दोघांना सांगण्याचा प्रयत्न केला, “अरे, तो ‘पशू’ नाही, ‘पशूपति’ आहे!”. पण व्यर्थ.  शेवटी एकदा त्याच्यासकट सर्वांना बोलावून त्या विषयी चर्चा केली आणि त्याला “पी.पी.” हे सर्वमान्य संबोधन मिळाले.

उत्तर भारतात स्वतःच्याच (मोठ्या)नावाचे हे असे संक्षिप्त रूप चालू शकते. पण हाच माणूस महाराष्ट्रात आला की, गडबड होते. आमचे एक वरिष्ठ रमेशकुमार तिवारी (आर्.के.तिवारी) यांचा पासपोर्ट नव्याने मुंबईत बनवायचा होता. त्यानुसार त्यांनी आपल्या सेक्रेटरीला आवश्यक कागदपत्रे दिली आणि ऑफिसातल्या पासपोर्ट/व्हीसाची कामे करणार्या एजंटच्या मदतीने अर्ज तयार करायला सांगितले. आता ती सेक्रेटरी आणि एजंट दोघेही मराठी. त्यांनी अर्ज तयार केला आणि साहेबांकडे गेले. त्यानंतरचा संवाद पुढीलप्रमाणे:
तिवारीसाहेब: अरे, मेरा नाम गलत लिखा है!
एजंट: सर, दिखाइए| (बघून) सर, सही तो लिखा है|
साहेब: क्या लिखा है?
एजंट: रमेशकुमार किसनलाल तिवारी| सही है|
साहेब(सेक्रेटरीला): क्या है मेरा नाम? रमेशकुमार तिवारी? सही है ना?
सेक्रेटरी: येस् सर...
साहेब: तो यहां क्यू गलत लिखा है?
सेक्रेटरी: सर, सही तो लिखा है|
साहेब (वैतागून): अरे, मेरे भाई, मेरा नाम रमेशकुमार तिवारी है| मेरे पिता का नाम किसनलाल तिवारी है| हम दोनो अलग इन्सान है| .....
असे म्हणत अर्जामधील किसनलाल खोडून काढले आणि त्या दोघांना ‘जा अर्ज पुन्हा भरून आणा’ असा दम भरून पिटाळून लावले. दोघेही आपले काहीही चुकलेले नाही या ठाम समजूतीत बाहेर आले. ‘बॉस कुछभी बात करता है, हमको सताने के लिए फिरसे फॉर्म भरनेको बोला है’ .. वगैरे चीडचीड शांत झाल्यावर त्यांना ‘उत्तरेत आपल्या नावात वडीलांचे नाव लावत नाहीत, उदा. एल्.के. आडवाणी हे लालकृष्ण आडवाणी आहेत. लालकृष्ण हे त्यांचेच नाव आहे. कृष्ण हे त्यांचे वडील नव्हेत!’ हा नावातील सांस्कृतिक फरक समजावून सांगितला आणि अखेर तिवारीसाहेबांना पासपोर्ट मिळालायचा मार्ग मोकळा झाला.
अजूनही काहीवेळेला सीके म्हणजे चंद्रकांत, जेपी म्हणजे जयप्रकाश, एन्एल् म्हणजे नंदलाल अशी नावे असलेली माणसे भेटली की अशा लोकांचा पासपोर्ट तपासून पहावा असे वाटते.

उत्तरेपेक्षा दक्षिणेची तर्हा निराळी आहे. इथे गावाचे नाव, कुटूंबाचे नाव, वडिलांचे नाव आणि स्वतःचे नाव असा प्रवास आहे. अर्थात ही काही सरसकट पद्धत नाही. कर्नाटकातल्या काही भागात महाराष्ट्राच्या नाव पद्धतीप्रमाणेच नाव, वडीलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशी पद्धत आहे. पण दक्षिण कर्नाटकात हे उलट झालेले पहायला मिळते. उदा. माजी पंतप्रधान एच्.डी. देवेगौडा आणि त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी. यातील “एच्” हे त्यांच्या गावाचे नाव दर्शवते.
तामिळनाडूत बहुतेक लोक वडिलांच्या नावाचे संक्षिप्त रूप स्वतःच्या नावाआधी लावतात. एस्. संजय, के. श्रीकांत वगैरे. माझा एक तमिळ मित्र स्वतःचे नाव पीए. रामदास असे लावतो. मी त्याला हटकले तेंव्हा खरा प्रकार समजला की ‘पीए” हे दोन स्वतंत्र शब्द नसुन तमिळ मधल्या ‘पळणीस्वामी’ या एकाच शब्दाचे लघूरूप आहे. लहानपणी शाळेत नाव लिहीताना तमिळ ‘प’ हे मुळाक्षर इंग्रजीतले ‘पीए’ झाले आणि त्याचा ‘पीए रामदास’ झाला. दिल्लीत बॅन्केत खाते उघडताना या वाढीव ‘ए’ ने त्याला इतका त्रास दिला की शेवटी त्या बॅन्केच्या कोईमतुर शाखेच्या व्यवस्थापकाशी त्याने दिल्लीतल्या व्यवस्थापकाचा संवाद घडवला तेंव्हा कुठे मामला मिटला.

भारतातच नावाविषयीचे असे नानाविध किस्से मिळतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय लोक जेंव्हा भारतात येतात तेंव्हा नावांची ही मजा ग्लोबल होते.
जपानी लोकांचे आदरार्थी संबोधन म्हणून ते नावाच्या मागे ‘सान’ लावतात. आमच्या जपानी वर्गात एक ओक नावाच्या मॅडम होत्या. त्यांना ‘ओकसान्’ म्हणताना तो जपानी शिक्षक इतका लाजला. खोलात गेल्यावर समजले ‘ओकसान्’ म्हणजे जपानीत ‘माझी प्रिय बायको’.
लहानपणी रामरक्षा रोज म्हटल्यामुळे जे फळ मिळत असे तसेच ग्लोबल फळ आता मॅडरिन किंवा चिनी लोकांची नावे ‘बिनचूक’ उच्चारल्यावर मिळते म्हणे! उदाहरणादाखल अगदी सोपे नाव घेऊ- SongYang! आता या भाषेत “g” म्हणायचा नसतो (silent). म्हणून या माणसाचे नाव “सुंयां” असे असते.
व्यक्ती भारतातील असो वा परदेशातील, प्रत्येकाला आपले नाव लोकांनी अचुकपणे उच्चारावे असे वाटणे स्वाभाविक आहे.  प्रसिद्ध management गुरू Dale Carnegie म्हणतो तसे “व्यक्तीचे नाव हा त्या व्यक्तीसाठी जगातला सर्वात सुंदर ध्वनी असतो”. त्याचा आदर राखलाच पाहिजे आणि प्रत्येक नावाचे संबोधन हे त्या नामधारीला जसे हवे तसेच झाले पाहीजे.....
कारण... जे काही आहे ते सर्व नावातंच आहे!

(विशेष सुचना: या लेखातील नावे ही सांकेतिक आहेत. जर या नावांमध्ये आणि नाव-गुणधर्मामध्ये कुणाशी साम्य आढळले तर लेख योग्य ठिकाणी पोहोचला, असे समजुया!).