२००८ चा हिवाळा. कडाक्याची थंडी आणि सोबतीला घनदाट धुकं. हायवेवरून गाडी चालवताना गाडीत जे काही लाईट्स, इंडिकेटर्स उपलब्ध आहेत ते सगळे सुरु ठेवायचे. गाडीतला “हिटर” आयुष्यात पहिल्यांदाच वापरलेला. इकडे घरी सोलापूरी पुलगमच्या चादरी बिनकामाच्या ठरल्या. नुसतेच स्वेटर्स पुरेसे पडत नव्हते – महाराष्ट्रातून पहिल्यांदाच दीर्घ काळ रहाण्यासाठी बाहेर पडलेल्या माझा आणि माझ्या कुटुंबियांचा हा दिल्ली/गुरगावचा पहिला अनुभव!!!
सुरुवातीला एकदा ऑफीसमध्ये मला एसीचा त्रास होतो आहे अशी तक्रार केली. तेंव्हा सुटाबुटातील एक व्यक्ती माझ्या केबिन मध्ये आली. मी त्यांना माझ्या अंगावर डक्टमधून थंड हवा येते आहे, हे सांगितले. थोड्या वेळाने तीच व्यक्ती शिडी घेऊन आली. सरसर वर चढून डक्टची दिशा बदलून निघून गेली. डक्ट ठीक करणारा माणूस सुटाबुटात आणि केबिनमधे बसणारा मी स्वेटर् घालून!! हा माझ्यासाठी धक्का होता. ‘हे मराठी माणसा, दिल्लीत रहायचे असेल तर “टेचात” रहायचे. इथे गावंढळ रहायचे नाही’ – हा सुरुवातीच्या दिवसातला दिल्लीचा आणखी एक अनुभव!!
आमच्या एका सहकार्याच्या वडिलांचे निधन झाले. आम्ही सगळे अंत्यसंस्काराला पंजाबीबागला गेलो. आणि तिथे माझ्या लक्षात आले की इतक्या सगळ्या माणसांत मी एकटाच जीन्स आणि टीशर्ट घालून आलोय. बाकी सगळे पांढराशुभ्र कुर्ता-पायजमा घालून आले आहेत. मी “युनिफॉर्म” मध्ये नाही त्यामुळे मी आत जाऊ शकतो का? – याची खातरजमा करून मगच मी अंत्यदर्शन घेतले.
दिल्लीकर होण्याचे सुरुवातीचे असे काही धक्के सोडले तर बाकी हा एक सुखद अनुभव आहे. (इथे दिल्लीकर असे मी म्हणतो तेंव्हा दिल्ली, नॉयडा, गुरगाव, फरीदाबाद वगैरे संपूर्ण दिल्ली परिसर अभिप्रेत आहे. कारण अस्सल दिल्लीकरांची गुरगाव, फरीदाबाद वगैरे भागाबद्दल वेगळी मतं आहेत, त्यावर नंतर कधीतरी लिहूया).
माझ्यामते मराठी दिल्लीकर तीन प्रकारचे आहेत.
पहिला – दोन-तीन पिढ्यांपासून हा मराठी माणूस दिल्लीत रहातो. याची मूळ भाषा मराठी तरी हा दिल्लीचा दिलवाला आहे.
दुसरा - नोकरी-धंद्याच्या निमित्ताने ही मंडळी दिल्लीत आली आणि पंचवीस तीस वर्षे दिल्लीत राहून दिल्लीकर झाली. यात सरकारी अधिकारी मोठ्या संख्येने आहेत.
तिसरा – फक्त दोन-तीन वर्ष इथे थांबून मी परत महाराष्ट्रात जाईन. किंवा दोन वर्षांनी बेंगलोरला जाईन, अमेरिकेला, सिंगापूरला जाईन. यातली काही माणसं कुटुंबासह येतात तर काही एकटीच.
या सगळ्यांमध्ये एक समान धागा असतो तो मराठीचा – मराठी संस्कृतीचा. मग फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर इंदौर, भोपाळ, ग्वाल्हेर चे बडोद्याचे, बेळगावचे मराठी भाषिक यात समाविष्ट होतात. आणि मग, ‘गुढीपाडव्याची शोभायात्रा कुठे आहे?” “विजयादशमीला सीमोल्लंघन सोहळा कुठे आहे?” “सत्यनारायणाच्या पुजेसाठी गुरूजी कुठे मिळतील?” याचा शोध सुरु होतो. आणि “गरज ही शोधाची जननी आहे” या उक्तीनुसार मग काही उत्साही मंडळी एकत्र येतात..तिथूनच मग गणेशोत्सवाची सुरुवात होते. कोजागिरी पौर्णिमा, चैत्रातील हळदी कुंकू इत्यादी कार्यक्रम सुरु होतात. दिल्ली आणि परिसरात हे सगळे उत्साहात पार पडते. यात भर म्हणून दिवाळी-पहाट, आषाढी एकादशीनिमित्त सांकेतिक वारी आदी कार्यक्रम दिल्लीकर मराठी माणसांना एकत्र आणण्यात मोलाची भर टाकतात. या सगळ्या कार्यक्रमांची पूर्वतयारी आणि तो कार्यक्रम पार पाडण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक जबाबदारी इथला मराठी माणूस आपल्या दैनंदिन नोकरी-धंद्यातील काळवेळ सांभाळून व्यवस्थित पार पाडतो.
अलिकडे यात अजून एक मराठी प्रकार वाढला आहे. जो उत्तर भारतीय आपल्या कामानिमित्त मुंबई, पुणे, नाशिक किंवा महाराष्ट्रातील कुठल्याशा जिल्ह्य़ात दहा-पंधरा वर्ष वास्तव्य करतो आणि नंतर परत उत्तर भारतात येतो, तोही दिल्लीकर मराठी म्हणून सहज मिसळून जातो. गणेशोत्सवासारख्या उत्सवात यांचा सहभाग लक्षणीय असतो. कधीकधी धेडगुजरी वाटलं तरी या मंडळींचे मराठी संस्कृतीवर प्रेम असते. माझ्या एका पंजाबी मित्राने आपल्या मुलीचे नाव “आत्या” ठेवले आहे. त्याचे स्पष्टीकरण देताना तो सांगतो, “मुंबईमें हमारे सामने एक मराठी फॅमिली रहती थी. उनकी छोटी बेटी ‘आत्या-आत्या’ करती थी. हमे अच्छा लगा और हमने हमारी बेटी का नाम ‘आद्या’ के बदले ‘आत्या’ रख दिया!!”
महाराष्ट्रातून आणि इतर भागातून दिल्लीत येणारी मराठी माणसे आपापल्या परंपरा घेऊन येतात आणि इथले “मराठीपण” विस्तीर्ण होत जाते. इथे कोकणातला, दक्षिण महाराष्ट्रातला किंवा बेळगावचा “दडपे पोहे” आवडणारा मराठी माणूस नागपूरच्या “तर्री पोह्यांचा” चाहता होतो. “सावजी” चा चाहता “तांबड्या-पांढर्या”चा भक्त होतो. अळूच्या पानांच्या वड्या किंवा अळूचे फतफते खाणारा आता अळूच्या मूळाची – अरवीची भाजी खाऊ लागतो. निरनिराळ्या मराठी रुढी, मराठी शब्दभांडार इथे सहज उपलब्ध होऊन जाते.
गणपती उत्सवाच्या काळात “महालक्ष्मीची” पुजा का करतात? हा माझा प्रश्न होता. आम्हा कोल्हापूरकरांना “महालक्ष्मी” म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई इतकंच ठाऊक आहे. कोल्हापूरात गणेशोत्सवात अंबाबाईची विशेष पुजा झाल्याचे इतक्या वर्षात ऐकलं किंवा पाहिलं नाही.. मग ही काय भानगड आहे हे मी आईला विचारले. ती म्हणाली, “महालक्ष्मी म्हणजेच गौरी!! काही भागात त्याला महालक्ष्मी म्हणतात.” आता त्या जेष्ठा आणि कनिष्ठा अशा दोघी असतात म्हणून त्या “महालक्ष्म्या” होतात. तेंव्हापासून मीपण “एकवचन म्हणजे कोल्हापूर” आणि “अनेकवचन म्हणजे गणेशोत्सव” हे पक्कं लक्षात ठेवलं आहे.
एकदा कुठल्यातरी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीत सगळ्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरु होती. कुणी स्टेजच्या मागचे बॅनर लावत होता, कुणी लाईट्स, कुणी ध्वनीव्यवस्था पहात होता. त्यात एक उत्साही कार्यकर्ता “मारतुल” शोधत होता. त्याने तिथे असलेल्या वीस-पंचवीस जणांना विचारले, “दादा, मारतुल आहे?” प्रत्येकाने हे “असले काय” माझ्याकडे नाही हे ठणकावून सांगितले. मग तो माझ्याकडे आला आणि तोच प्रश्न- “दादा, मारतुल आहे?” मी उडालोच! म्हटलं, “भावा, कोल्लापूर काय??” त्याला सांगितले “मारतुल” म्हणण्या ऐवजी “स्क्रू ड्रायवर” माग, कुणीही देईल!! आणि त्याला जो स्क्रू टाईट करायचा होता तो बिनदिक्कत झाला!!
दिल्लीत मराठी म्हणून रहाण्याचे अनेक फायदे आहेत. इथले मराठी उत्सव अजून (महाराष्ट्राइतके) भव्य आणि कमर्शियल झालेले नाहीत. त्यामुळे इथे प्रत्येक लहान-मोठ्या उत्साही कार्यकर्त्याला आपली आवड जपण्याची आणि वाढवण्याची संधी मिळते. हौशी गायक, वादक, चित्रकार अगदी बॅकस्टेज आर्टिस्टलाही इथे मोकळीक मिळते. आयोजनातील गमती-जमती तर अफाट आहेत. एका वर्षी कोजागिरीसाठी पाच किलो चारोळ्या पुण्याहून आणल्या होत्या!! जुन्या दिल्लीकरांचे अनुभव आणि दिल्लीचे मराठीपण जपण्यात या मंडळींनी केलेले विशेष प्रयत्न ऐकणे ही पर्वणीच असते.
निरनिराळ्या मराठी प्रदेशातून दिल्लीत आलेली मराठी कुटुंबे दिल्लीच्या निरनिराळ्या भागात रहात असली तरी विविध उपक्रमांसाठी “दिल्ली मराठी कुटुंब” म्हणून एकत्र येतात. अलिकडच्या मराठी साहित्य संमेलनात याचा पुरेपूर अनुभव आला.
२००८ मथ्ये “दिल्लीकर व्हावे का?”ह्या प्रश्नापासून सुरु झालेली साठा उत्तराची कहाणी, २०२५ मध्ये “दिल्लीकर का व्हावे?” हे सांगण्यायोग्य सुफळ संपूर्ण झाली, हेच दिलवाल्या दिल्लीचे आपलेपण आहे.
*****