Thursday, 17 June 2021

राफ्टींग बोट

 गुरगांवला नवीन कंपनीत आलो आणि पहिलेच काम मिळाले ते मुंबई आणि महाराष्ट्रातील टेलिकॉम नेटवर्क उभारणीच्या प्रोजेक्ट मध्ये. टेलिकॉम मध्ये मुंबई (महानगर) स्वतंत्र आणि उर्वरित महाराष्ट्रासह गोवा असे दोन स्वतंत्र विभाग आहेत. मी येण्याच्या काही दिवस आधी मुंबई महानगराचे काम सुरु झाले होते. उर्वरित महाराष्ट्रासह गोव्यासाठी अजून परवानगी यायची होती. याआधी महाराष्ट्रात काम केल्यामुळे आणि राज्य ‘आपलेच’ असल्याने नेटवर्क उभारणीच्या प्रोजेक्ट मध्ये काम करणे हे अवघड नव्हते. 

बजेट कमी करत फक्त थोडेसे टॉवर उभे करून नाममात्र नेटवर्क सुरू करा अशी परवानगी मिळाली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यानुसार काही महत्त्वाच्या शहरांमध्ये नेटवर्क उभे करावे असे ठरले. मग पुणे आणि गोवा इथे प्राधान्याने आणि उरलेले टॉवर्स इतर ठिकाणी अशी एक सर्वसाधारण  योजना बनवली गेली.. त्यानुसार उरलेले टॉवर्स तिसऱ्या मोठ्या शहरात म्हणजे नागपुरात लावावे असे प्रोजेक्ट टीमने ठरवले आणि माझ्याकडे ऑर्डर साठी फाईल पाठवली. मला नागपूर ऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर कव्हरेज द्यावे असे वाटत होते. ते पुणे-नागपूर जोडण्यापेक्षा स्वस्त आणि बिझनेस साठी फायदेशीर होते. पण मी अगदीच नवीन असल्याने माझे कोण ऐकणार ह्या पार्श्वभूमीवर मी माझे मत माझ्या बॉसकडे मांडले. त्यांना ते समजले आणि त्यांनी मला पश्चिम विभागीय बिझनेस हेड ना भेटायला सांगितले. मी ओळखत नव्हतो. त्यावर ‘तुम एक बार मिल लो, अपने आप दोस्ती हो जाएगी' असा दिलासा मिळाला. मग विभागीय बिझनेस हैड साहेबांची वेळ मागितली. भेटायला गेलो..मुळचा पंजाबी माणूस, जयपूरला स्थायिक आणि मुंबईत खूप वर्षे काम केल्यामुळे खडानखडा माहिती...

“आओ, मराठी माणूस!! कसा काय? बरा हाय ना?” अशी अर्धवट मराठीत सुरुवात करून मला हलकं केलं. माझा मुद्दा समजून घेतला. तो त्यांना पटलाही. लगेच इंजिनिअरिंगच्या मंडळींना बोलावून त्यांना नेटवर्क मध्ये ‘तसे’ बदल करायला लावले आणि माझी त्या कोअर टीममधली जागा मजबूत झाली.

नंतर भेटी होत राहिल्या. हळूहळू प्रोजेक्ट पुढे सरकत होता. ठरलेल्या वेळी मुंबईत सर्व्हिस सुरू झाली. शंकर-एहसान-लॉय ने संगीतबद्ध केलेल्या सिग्नेचर ट्यूनला चांगला प्रतिसाद मिळत होता. मुंबईत प्रतिसाद छान होता…पण काहीतरी कमी होते..

पूर्वीपासून मुंबईत सेवा देणाऱ्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी काहीतरी ‘वेगळे’ करायची गरज होती.

एक दिवस मला मिटींगमध्ये बोलावले आणि विचारले, “ मुंबई की बारिश में सबसे पहले कौनसा ट्रॅफिक बंद होता है?”.. मी म्हणालो, “ मिलन सबवे और हिंदमाता!”..

ते खूष झाले आणि मला म्हणाले अब आगे देखो.. मी प्रेझेंटेशन ऐकत गेलो. ब्रॅंड टीम, एजन्सी आणि सगळ्याच मुंबईच्या सहकारी मंडळींनी कमाल केली होती. ही योजना खरंच थक्क करणारी होती.

मुंबईत मिलन सबवेच्या बाहेरचे एक मोठे होर्डींग्ज भाड्याने घेतले होते. त्यावर एक राफ्टींगची बोट बांधण्यात आली होती. कंपनीचे ब्रॅन्डींग करून त्या होर्डिंग्ज वर लिहिले होते – “आपत्कालीन परिस्थितीत हे दोर कापा आणि ही बोट वापरा”…

ही कल्पना चांगलीच गाजली. एक-दोन‌वेळा ‘ते’ दोर कापलेसुद्धा गेले!! सगळीकडे गवगवा झाला होता. महानगरपालिका, मिडीया या सगळ्यांनी दखल घेतली. या वेगळ्या कल्पनेचे मुंबईकरांनाही कौतुक केले.

ब्रॅंड ची ओळख वाढली!!

दरवर्षी पाऊस पडला की मुंबई तुंबते. मिलन सबवे, हिंदमाता सर्कलमध्ये पाणी साचते. आणि आमच्या ‘बोटीची’ आठवण येते!!


No comments:

Post a Comment