Wednesday, 17 July 2019

पाऊस

पाऊस

पाऊस तसाही मला अगदी लहानपणापासून कधीच आवडला नाही.  लहानपणीचा पाऊस म्हणजे चिखल, दलदल, शाळेला भिजत जाणे वगैरे वैताग असण्यापेक्षाही नदीला येणारा अक्राळविक्राळ पूर, आजुबाजुला तीरावरची बुडालेली शेते, पूरामुळे संपर्क तुटलेली गावे इत्यादी गोष्टींमुळे भयावह होता.
अगदी कुणाच्या बागेत किंवा शेतात जायचे म्हटले तरी चपलांसकट पाउल उचलायला पडलेले कष्ट, चपलांना लागून (किंवा चपला न घालता गेलो तर पायाला लागून) सोबत येणारा चिखल. आजुबाजूला आपल्यापेक्षा बिनधास्त बागडणारे बेडूक, गोगलगायी, क्वचित एखाद्-दूसरा गवतातून वळवळत जाणारा साप हे सगळंच भयानक होतं.

पुढे जसजसे मोठे होत गेलो तसे मग नेमक्या वेळेला उलटी होणारी छत्री किंवा आत पाणी जाऊन ओला होणारा किंवा पाऊस येईल म्हणून घातला आणि पाऊस आला नाही की अंगातला घाम काढणारा रेनकोट, सायकलच्या रस्त्यावर असणारे पण पाण्यामुळे न दिसणारे खड्डे आणि ते जर दिसले अन् चुकवायला बाजूला गेले की शेजारून जाणार्या गाडीने घातलेले स्नान! हे सगळं-सगळं ओंगळवाणं होतं!! मोठेपणातल्या मोठ्या शहरातल्या अडचणी मोठ्या आहेतच. घरातून बाहेर पडल्यावर कधी परत घरी येईन याची शाश्वती न देणारा पाऊस ही मोठेपणातील मोठी गोष्ट.

हे सगळे स्वानुभव पाठीशी असल्यामुळे पाऊस कसा आनंद देतो हे आजवर मला समजलेलेच नाही. अगदी ‘यंदा,  माझ्या शेतीला हवा तेवढा आणि हवा तेंव्हा पाऊस पडलाय’ असे ठामपणे सांगणारा शेतकरी मला गेल्या चार-साडेचार दशकात सापडलेला नाही. ग्रामीण व्यवस्था ही पावसावर अवलंबून आहे हे पुस्तकी वाक्य प्रत्यक्षात अनुभवताना मला आठवतात ती पूरामुळे संपर्क तुटलेली गावे, खंडीत वीजपूरवठा आणि त्यामुळे बियाणे आहे तर खत नाही, दोन्ही असेल तर मजूर नाहीत आणि  सगळे सुरळीत झाले तर परतीच्या पावसाने उखडून टाकलेली पेरणी!! शहरांची तर बातच और!! वाढलेली कॉन्क्रिट-जंगले, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नसलेली पूरक सुविधा. अगदी अशी सुविधा असलीच तर त्यातले प्लॅस्टिक न काढल्यामुळे तुंबलेली. विस्कटलेली दळणवळणाची व्यवस्था, वीज-पाणी, भाजीपाला आदि अत्यावश्यक वस्तूंची आबाळ.....

आणि हे सगळे कमी म्हणून “पावसाचा आनंद साजरा करण्याचा” अट्टाहास! माळशेज घाट, लोणावळ्याचे भूशी धरण, खडकवासला, सिंहगड किंवा ड्यूकचा धबधबा – ही पुण्या-मुंबईच्या लोकांची आवडती पावसाळी डेस्टीनेशन्स!! तिथे उद्भवणारी धोकादायक आणि (बहुतेकवेळा) गलिच्छ परिस्थिती, पोलीस बंदोबस्तात रेन-डान्स आणि धबधब्यासारखी वाहणारी दारू- हाच का तो शहरी पावसाचा आनंद?

मुळात हे सगळे असे का?? आपण निसर्गाचा पराभव करून त्याला वश करू इच्छितो का? अगदी यंदाचा पावसाळा ही पुण्यात बिल्डींगची भिंत कोसळून पंधरा जणांना, मग मालाडमध्ये काही जणांना कवेत घेऊन निसर्गाने साजरा केलाच. मग तिवरे धरण फुटले, काल खारघरला बंधारा फुटला... आपल्याला आठवत असेल, दोन वर्षांपूर्वी पुणे नाशिक रोडवरून पहाटे जाणारी बस अचानक थांबली. ड्रायव्हरला तिथे एक गाव होते ते दिसेचना. मग कोसळणार्या पावसात शोधा-शोध केली तेंव्हा कळले की हे डोगराच्या कुशीत वसलेले गाव डोंगर कोसळून अख्खे वाहून गेले आहे!
मग चौकशी समिती नेमली जाते, एक-दोन अधिकारी निलंबीत होतात आणि चॅप्टर संपते. या सगळ्यातून एकच गोष्ट समोर येते की आपण निसर्गाला हरवण्यासाठी लढतो आहोत. पूर्वी पुणे-मुंबई प्रवासाला चार-पाच तास लागत. मग आपण सह्याद्रीला चार-पाच भोके पाडली आणि बोगद्याद्वारे एक्सप्रेस वे तयार केला आणि हे अंतर दोन तासांवर आणले. आता अजून सह्याद्री कुरतडायचा आणि हायपर-लूपने हे अंतर बारा-पंधरा मिनीटांवर आणायचे आहे!!

सरकार एका दिवशी हायवेच्या समृद्धी साठी जमिन संपादित करते आणि दुसर्या दिवशी तेहतीस कोटी झाडे लावण्याचा संकल्प करते. प्रत्येकाचे वेगवेगळे टारगेट्स असतात त्यांचा एकमेकांशी संबंध असण्याची गरजच नसते. असा ‘सबका विकास’ आपल्याला हवाय का??

पावसावर कविता करणारे कवी हा माझा लहानपणापासूनच कुतूहलाचा विषय आहे. पावसावर धो-धो कविता करणारी ही मंडळी माझ्या आवडत्या उन्हाळ्यावर मात्र ‘ग्रीष्म’ ‘पानझड’ असे त्रोटक शब्द वापरून आपली सूटका करून घेतात. याउलट कोकणचा मेवा, शाळेला सुट्टी, खेळायला मिळणारी (कवींच्या भाषेतील ‘रूक्ष’) मैदाने, सुट्टीतल्या पाहुणेमंडळीमुळे वाढलेली खेळ-भिडूंची संख्या इत्यादी गोष्टी उन्हाळ्यात पूरक असूनही कवी-मन पावसातच रमते.  ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ असे म्हणतात. पावसात रवी-राज हे ढगांच्या आड लपलेले असल्यामुळे या कवीराज मंडळाचे फावते. तेच उन्हाळ्यात सगळा ताबा हा रवीचा असल्यामुळे कवींना फारसा वाव नसावा अशी माझी लहानपणापासूनच समजूत आहे.

असो.
मुळात पावसाळी कुंद कळ्यांचा गंध आपल्या आयुष्यात जरासा मंद असल्यामुळे कवीचा छंद लिहीण्याऐवजी लिहीला निबंध!

No comments:

Post a Comment